याच साठी केला हा अट्टहास....
कोणत्याही संताची दोन चरित्रे असतात- धार्मिक आणि सामाजिक. धार्मिक चरित्रात त्या संताचे काव्य आणि त्याच्या कथा, अध्यात्म आणि चमत्कार हे असते. साहजिकच ते लोकप्रिय असते. जनमानसावर त्याचाच पगडा असतो. पण संतांचे अध्यात्म हे काही आभाळातून पडलेले नसते. म्हणजे, त्यांच्या भक्तांना तसे वाटत असले तरी ते तसे नसते. अखेर कोणत्याही धर्माची, धर्मसंकल्पनांची मुळं ही भौतिक परिस्थितीत असतात. संतांच्या अध्यात्माचा उगमही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतून होत असतो. या अर्थी त्यांचे अध्यात्म हे त्या महामानवांची जीवनगाथा असते.
वारकरी संप्रदायातील संत-परंपरा पाहता अभंग,साहित्यातून संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत अलुते-बलुतेदारीतील अनेक संत महामानवाचा जीवनसंघर्ष व बहुजनहितकारी कार्याचा चलचित्र डोळ्यासमोर उभे राहते. प्रत्येक लोकचळवळीच्या मागे एक ठरलेलं व ठरवलेलं ' पॉलिटिक्स ' असतं अगदी त्यातून इत्तर अध्यात्मिक चळवळीसह बहुजनांची "वारकरी सांप्रदायिक" चळवळ हि सुटलेली नाही. कालानुरूप व्यक्तिपरत्वे त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आले.
प्रक्रियेत अनेक महामानवांची खरी ओळख उपेक्षित म्हण्यापेक्षा दुर्लक्षित झाली. हेच ' पॉलिटिक्स ' ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत ते अगदी पहिला वारकरी,अभंगकार,कीर्तनकार असणाऱ्या संत नामदेवांपर्यंत पोहचलेले आहे. या संदर्भान्व्ये विठ्ठलपंतांना अभय देणारे, धर्ममार्तंडाचा रोष पत्करून बहिष्कृत ज्ञानदेवादी भावंडांचे संगोपन.. अर्थाने सर्वांगाने प्रतिभा संवर्धन करणारे आद्यसंत श्री भोजलिंग काकांचा जीवनपट हि मर्यादितच राहिला...अगदी आळंदीच्या समाधिमंदिरातील साळुंका व फलकापुरताच !
शिंप्यांचा नामदेव,कुणब्याच तुकोबा,माळ्याचा सावता, चांभाराचा रोहिदास, सोनारांचा नरहरी,अगदी गोरोबा कुंभार ते चोखामेळा पर्यंत जातीसह नामोल्लेखलेल्या संत मंडळीत सुतारांच्या भोजलिंगालाही केवळ "व्यवसायाने सुतार" केला. वर्णाने शूद्र, व्यवसायाने बलुतेदार व जातीव्यवस्थेत सुतार असणाऱ्या आजच्या सुतारांनाही भोजलिंग स्वीकारण्यास बराच कालावधी घालावा लागला.
जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही,तसेच अजाणतेपणे धर्माच्या दांभिकतेतून मिथ्या अहंकार स्वीकारतो तेंव्हा सर्वसामान्य समाज आपले 'संचित' सोडून पदर उसना इतिहासाकडे आकर्षित होतो. संत भोजलिंग काकाचे अध्यात्मिक व आदिभौतिक स्थान समजून घेतल्यास समाज परिवर्तनातील सर्व निकष, अध्यात्मिक दिशा हि सार्थकी लागते.
सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या समाजासाठी 'आयकॉन' म्हणून भोजलिंग माथी मारण्यात कोणताही रस नाही, उलट कालानुरूप प्रस्थापित धर्मसत्तेविरुद्धचा संघर्ष स्वतः होऊन स्वीकारणारे व महाराष्ट्राच्या भूमीतील वारकरी संप्रदायाला संत ज्ञानदेवासारखा अलौकीक 'ज्ञानप्रकाश' देणारे 'महामानव' ओळख करून देण्याचा प्रयत्न असेल.
माझ्याठायी भोजलिंगकाका तुमच्या आमच्यासारखाच सर्व सामान्य पण त्यांनी फार मोठ्या ध्यासाने मानवतेची लढाई लढून मनात जपली..उभारली. हा संदर्भ इतिहासाच्या काळजावर कोरलेला आहेच. भोजलिंगच्या नावे समाज एकत्र येईल, फार फार तर 'सोशियल अजेंडा' ठरवून त्यांना विशिष्ट्य जातीमध्ये मर्यादित केले जाईल. पण यापुढे काय ? त्याकाळच्या धर्ममार्तंडांना धाडसाने भिडणारे ते 'सुतार' होते का? हि लढाई केवळ त्याकाळापुरतीच नव्हती तर आजपासून नऊशे वर्षांपासून उभ्या महाराष्ट्रातील समाजात समता व सामाजिक चैतन्य जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची होती. वारकरी सांप्रदाय या लोकचळवळीचे महासमनव्यक व संघटक म्हणून भोजलिंकाका स्वीकारताना आद्य वारकरी,अभंगकार व पहिले कीर्तनकार संत नामदेव, संप्रदायाला संजीवनी देणारे संत ज्ञानदेवांसह, वारकरी संप्रदायाला लोकचळवळीचे स्वरूप देणारे जगतगुरु तुकोबाराय यांच्या वाट्याला आलेला जीवनसंघर्ष समजून घ्यावाच लागेल.
आज आठशे-नऊशे वर्षानंतर भोजलिंग काकांचा परिचय होत आहे, आणि एक पर्वाची सुरुवातही होत आहे. पुढे-मागे संत भोजलिंगच्या नावे सोशियल मीडिया हि गाजेल, बहू उद्देशीय संस्था,संघटना हि होतील. सामाजिक कार्याच्या नावे वधुवर परिचय सोहळे व ठरलेले मॅनेजड 'समाजभूषण' हि वाटप होतील. आणि असेच जर भोजलिंगाबाबतही घडले तर समाजकार्याच्या नावावर समाजावर होणार हा अन्याय आहे. बाह्यपणा जपणारी हीच मंडळी समाजासाठीची नवी गुलामगिरी भक्कम करतील. समाजबाह्य शक्तीसमोर लुळे पांगळे असणारे पुन्हा मनासाठी शूरवीर ठरतील. त्यापेक्षा समजून न उमजलेला महामानव पुन्हा दुर्लक्षित केलेलाच बरा..
जय सुतार💯👑
ReplyDeleteमनोज एकनाथ सुतार
ReplyDelete